बारामती पोटनिवडणुकीत अजितदादांना श्रद्धांजली देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आम्ही उमेदवार देणार नाही, असे स्पष्ट केले होते. बारामती विधानसभा पोटनिवडणूकीत सुनेत्रावहिनी पवार चांगल्या मतांनी निवडून येतील. बारामतीची जनता त्यांना ऐतिहासिक विजय मिळवून देईल, असा आम्हाला विश्वास आहे. काँग्रेसने विलंब का होईना पाठिंबा दिला, ही जमेची बाजू आहे. असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी मुंबई येथे पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले आहे.
शशिकांत शिंदे बोलताना म्हणाले की, शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी देखील आम्ही उमेदवार देणार नाही अशी भूमिका दादांना श्रद्धांजली म्हणून जाहीर केलेली आहे. अपक्ष उमेदवार हे उभे राहिलेले जरी असले तरी बारामतीची जनता ही फार मोठ्या प्रमाणात ऐतिहासिक सुनेत्रावहिनी पवार यांना विजय करून देतील, हा विश्वास आम्हाला आहे, मतदानाची टक्केवारी किती होते आणि आकडा काय येतो त्यावर सगळं अवलंबून आहे, असे सांगितले.
शशिकांत शिंदे म्हणाले की, महाराष्ट्राच्या राजकारणात मित्रपक्षांना स्वतःच्या अस्तित्वाची लढाई करावी लागते, हे आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पहायला मिळालंय. भाजपा काही लोकांचे पक्षप्रवेश घेऊन त्यांना मित्रपक्षांसमोर उभं करतंय, हा धोका अजितदादांनी ओळखला होता.त्यामुळे दोन्ही पक्ष एकत्रिकरणाचा निर्णय झाला होता असे म्हणाले.
शशिकांत शिंदे म्हणाले की, अजितदादा आणि आम्ही एकत्रित येऊन भविष्य काळात मुख्यमंत्री पदासंदर्भात आराखडे तयार करताना किती संख्या असावी? याचंदेखील नियोजन आम्ही केलं होतं. त्यामुळे रोहित पवार म्हणालेत ती वस्तुस्थिती आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित आल्यानंतर एक पर्याय उभा राहिला असता आणि अजितदादा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊ शकले असते असेही स्पष्ट केले.
शशिकांत शिंदे म्हणाले की, भारतीय जनता पक्षाकडे विधान परिषदेसाठी इच्छुकांची संख्या जास्त आहे, असं कळतंय. विधान परिषदेच्या जागा वाढवता येतात का? असं ते बघतील. त्यासाठी ते एखादा जीआर काढतात का? ते बघावं लागेल असेही म्हटले आहे.
पुढे बोलताना शशिकांत शिंदे म्हणाले की, प्राजक्त तनपुरे राहुरी विधानसभा पोटनिवडणूकीत का उभे राहिले नाहीत ? त्याची कारणे त्यांनी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आणि मला सांगितलेली आहेत. निवडणूक न लढवता त्यांनी तटस्थ भूमिका निवडलेली आहे. त्यांच्या पक्षप्रवेशासंदर्भातल्या चर्चामध्ये काहीच तथ्य नाही असेही सांगितले.
शशिकांत शिंदे म्हणाले की, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असेल किंवा काँग्रेस असेल यावर बरीच चर्चा झाली, काँग्रेसने पण माघार घेतली,त्यामध्ये आदरणीय पवार साहेबांनी, सगळ्यांनीच मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, मला वाटतं निवडणूक लागलेली आहे, कोण कमी पडलं यापेक्षा ही निवडणूक निवडून येण्यासंदर्भात काय केलं पाहिजे या संदर्भात चर्चा झालेली आहे,असे म्हणाले.
Marathi e-Batmya