जयंत पाटील म्हणाले, शिवसेनेतील बंडाळी ही भाजपाप्रणितच…

हिंदूत्वाची मतं फुटतील आणि आपल्याला महाराष्ट्रात कधीच सत्तेवर येता येणार नाही या भीतीने भाजपाला ग्रासले असल्यामुळे शिवसेना फोडण्याचे पाप भाजपाने केले अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कोल्हापूर येथे माध्यमांशी बोलताना आज केली.
शिवसेनेतील बंडाळी ही शिवसेनेची कधीच नव्हती ती भाजपाप्रणितच होती असा जोरदार हल्लाबोलही त्यांनी केला.

जयंत पाटील म्हणाले, काहीही झालं तरी प्रोफेशनली आपल्याला टिकायचे तर समोरचा पक्ष फोडला पाहिजे हा उद्देश ठेवून भाजपाने शिवसेना फोडली तसे कारस्थान रचण्यात आले. आता नावही आणि चिन्हही काढून घेण्यात आले. त्यामुळे उध्दव ठाकरे यांच्या घरातील शिवसेना चोरीला गेली आणि ती कुणाच्या घरात गेली हे थोड्या दिवसात समोर येईल म्हणजेच एकनाथ शिंदे यांच्याकडे देण्याची व्यवस्था आयोगाच्या माध्यमातून होईल यात शंका नाही असा थेट आरोपही केला.
एकनाथ शिंदे यांनी बंडाळीची कबुलीच दिल्यामुळे अर्थ स्पष्ट आहे की, शिवसेना फोडण्याचे आणि बाळासाहेबांच्या पक्षाचे दोन तुकडे करण्याचे कारस्थान भाजपाने केले आहे असा आरोपही त्यांनी केला.

आता बाळासाहेबांची शिवसेना हे नाव निवडणूक आयोग मान्य करतो. बाळासाहेब ठाकरे हे उध्दव ठाकरे यांचे वडील. उध्दव ठाकरे यांचा त्या नावावर पूर्ण अधिकार असताना निवडणूक आयोग निर्णय घेतो हे किती प्लॅनिंगने सुरु आहे आणि भयंकर आहे हे महाराष्ट्रातील जनतेच्या लक्षात येतेय. त्यामुळेच राज्यातील जनतेचा भाजपा आणि एकनाथ शिंदे सरकारवरील राग पदोपदी वाढतोय असेही ते म्हणाले.

शिवसेनेने ज्याला उमेदवारी दिली आहे. त्याला साम-दाम-दंड भेद वापरायचा व त्याला पळवायचे हे योग्य आहे का? असा संतप्त सवाल करत जयंत पाटील पुढे म्हणाले, जो उमेदवार शिवसेनेने ठरवला त्याचा प्रचार शिवसेनेने केला. अंधेरी विधानसभा मतदारसंघात शंभर टक्के शिवसेना निवडून येईल अशी परिस्थिती आहे. यातून महाराष्ट्रातील जनमताची एक छोटीशी चाचणी मुंबईकरांची होणार आहे. अंधेरी मतदारसंघात मराठी भाषिक संख्या मर्यादित असून हा बहुभाषिक मतदारसंघ आहे. त्यामुळे तिथला निर्णय कसा येतो आणि काय येतो हे बघण्याचे औत्सुक्य असतानाच उमेदवार पळवायचा. हे जे लोक करत असतील तर राज्यातील जनतेच्या लक्षात येईल आणि पुढच्या विधानसभा निवडणुकीत यांच्याविरोधात कोण उभा राहणार नाही याची व्यवस्थाही ते करु शकतील असा उपरोधिक टोलाही लगावला.

शिवसेनेचा जो फुटीर गट आहे त्याचा पदोपदी महाराष्ट्रात निषेध व्हायला लागला आहे, म्हणून मग कुणावर बोलायचं तर राष्ट्रवादीवर हा त्यांचा उद्देश आहे. राष्ट्रवादीने शिवसेना, कॉंग्रेस यांच्यासोबत पुढाकार घेऊन साथ दिली आणि पवारसाहेबांनी महाविकास आघाडीची स्थापना केली असेही जयंत पाटील यांनी ठणकावून सांगितले.

About Editor

Check Also

शालेय शिक्षण विभाग आणि गुगल दरम्यान कृत्रिम बुद्धिमत्ता प्रशिक्षणासाठी करार राज्यातील चार लाख शिक्षकांना मिळणार लाभ

राज्यातील शिक्षकांना कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डिजिटल तंत्रज्ञानाचे प्रगत प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी शालेय शिक्षण विभाग …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *