काही वर्षापूर्वी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळात राज्यात खाजगी विद्यापीठांना अभिमत विद्यापीठाचा दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यावेळी ॲमिटी विद्यापीठालाही अभिमत विद्यापीठाचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी काँग्रेसकडून अधिवेशन संपण्याच्या एक-दोन दिवस आधी संध्याकाळी विधानसभा आणि विधान परिषदेत त्याविषयीचे विधेयक मंजूर करण्यात आले. तसेच त्यानंतर काही वेळातच ॲमिटी विद्यापीठाला खाजगी अभिमत विद्यापीठाचा दर्जा देणाऱ्या विधेयकावर राज्यपालांच्या सहीसाठी राजभवनावर पाठविण्यात आले. आणि त्यानंतरच्या दोन दिवसात काँग्रेसकडून त्यासंदर्भातील शासकिय गॅझेट जारी करण्यात आले.
ॲमिटी विद्यापीठ ही खाजगी आणि श्रीमंत मुलांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यासाठी स्थापन करण्यात आली आहे. तसेच तेथील मुलांचे जीवनमानही उच्च श्रीमंती पद्धतीचे आहे. त्यावेळी ॲमिटी विद्यापीठ मुंबई शहराच्य. जवळपास सुरु करण्यासाठी प्रयत्नशील होते. मात्र त्यावेळी मुंबई शहराच्या परिसरात ॲमिटी विद्यापीठ सुरु करता आले नाही. मात्र त्यावेळी पनवेल येथे जमिन मिळाली. त्यामुळे ॲमिटी विद्यापीठ पनवेल येथे सुरु करण्यात आले.
आज त्याच विद्यापाठीवर काँग्रेसनंतर भाजपानेही मर्जी दाखवित १५ एकर जमीन देण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
ॲमिटी विद्यापीठाची मुळ संस्था असलेल्या रितनंद बलवेद एज्युकेशन फाऊंडेशन या शैक्षणिक संस्थेला मौजे भाताण (ता. पनवेल, जि. रायगड) येथील १५ एकर जमीन देण्यास आज मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.
रितनंद बलवेद एज्युकेशन फाऊंडेशनच्या या ॲमिटी विद्यापीठांतर्गत १८ शाखांमधून विविध शैक्षणिक अभ्यासक्रम शिकवले जातात. याठिकाणी पाच हजारांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत असून इतर अभ्यासक्रम आणि शैक्षणिक विस्तारासाठी संस्थेने जमिनीची मागणी केली होती. त्यानुसार मौजे भाताण, ता. पनवेल, जि. रायगड येथील ( स.न. ८/०, ९/२, १०/३, १३/५, १४/०,, १६७/१, १७८/०, १८२/४) या आकारीपड जमिनीपैकी सुमारे १५ एकर जमीन विशेष बाब म्हणून देण्यास मंजुरी देण्यात आली. ही जमीन कब्जेहक्काची रक्कम भरून घेऊन वर्ग-२ या धारणाधिकाराने उपलब्ध करून दिली जाणार आहे. या जमिनीचा वापर शैक्षणिक संकुल तसेच खेळाची मैदाने, वसतीगृहे, ग्रंथालय, प्रयोगशाळा अशा शैक्षणिक कारणासाठी केली जाणार आहे.
त्यामुळे आतापर्यंत काँग्रेसकडून घेण्यात आलेल्या अनेक निर्णयावर भाजपाकडून टीका करण्यात आलेली आहे. किंवा त्याला ओव्हर रूल करणारे निर्णयही घेण्यात आलेत आहेत. मात्र ॲमिटी विद्यापीठासाठी काँग्रेसने निर्णय घेऊनही याच विद्यापीठाला जमिन देण्यासाठी भाजपाने पुढाकार घेत जमिनही देऊन टाकली असल्याने काँग्रेसच्या निर्णयावर भाजपाने शिक्कामोर्तब केल्याचे दिसून आले.
Marathi e-Batmya