कोट्यावधी रुपयांचा निधी आणि विकासकामांना मंजुरी घेऊन ऐन निवडणुकीत अजित पवार यांची साथ सोडणाऱ्या आमदारांना व माजी आमदारांना या निवडणुकीत दारुण पराभवाला सामोरे जावे लागल्याचे चित्र महाराष्ट्रात पहायला मिळाले. त्यामुळे अजित पवार यांची साथ सोडणारे पुन्हा निवडूण आले नाहीत हाच ट्रेंड पहायला मिळत असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसच्या समर्थकांकडून करण्यात येत आहे.
बुलढाणा जिल्हा बँकेला कर्जातून बाहेर काढण्यासाठी अजित पवार यांच्यासोबत राहिलो अशी कबुली देत नंतर तुतारी हातात घेणारे माजी मंत्री राजेंद्र शिंगणे यांना मनोज कायंदे यांनी पराभूत केले, विधानपरिषदेवर तिसरी टर्म आमदार राहिलेले सतिश चव्हाण यांना भाजपाच्या प्रशांत बंब यांनी पराभूत केले, रामराजे नाईक निंबाळकर यांचे कट्टर समर्थक आमदार दिपक चव्हाण यांना सचिन पाटील यांनी पराभूत केले तर, माजी आमदार बाबाजानी दुर्रानी यांना पाथरीतून राजेश विटेकर यांनी दारुण पराभूत केले, तर आमदार बबन शिंदे यांचा मुलगा रणजित शिंदे यांना भाजपाच्या उमेदवाराने पराभूत केले, खासदार निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके यांना काशिनाथ दाते यांनी पराभूत केले, तर मानसिंगराव नाईक यांना भाजपाच्या उमेदवाराकडून पराभव पत्करावा लागला, आमदार संजयमामा शिंदे यांनाही पराभवाचा सामना करावा लागल्याचे सांगण्यात येत आहे.
ज्येष्ठ नेते शरद पवार यांची साथ सोडणारा आमदार पुन्हा कधी निवडून आला नाही असे बोलले जात होते, मात्र यावेळच्या निवडणूकीत अजित पवार यांची साथ सोडणारे आमदार पुन्हा निवडून आले नाही. त्यामुळे आता अजित पवार यांची साथ सोडणारे पुन्हा निवडून येणार नाही अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
Marathi e-Batmya