भंडारालगत कोका वन्यजीवन अभयारण्याच्या बफर झोन जवळील गावात महिलेवर वाघाने हल्ला करून ठार केले. यामुळे जनतेत रोष आहे. या प्रकरणी लोकांनी वन विभागाच्या विरोधात चक्काजाम आंदोलन केले. बिबट्याच्या हल्ल्यात देखील लोकांची जीवित हानी होत आहे. त्यामुळे वाघ आणि बिबटे ज्या गावाच्या आसपास येतात त्या गावांना साखळी कुंपण घालावे अशी मागणी विधानसभेत लक्षवेधी प्रश्नाच्या माध्यमातून विजय वडेट्टीवार यांनी केली.
विधानसभेत काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांनी वाघ आणि बिबट्यांमुळे शेतीचे नुकसान होत आहे. या प्राण्यांच्या वावर मुळे शेतकरी भयभीत होतात ते शेती हंगामात शेतीत जाऊ शकत नाही. त्यामुळे जी गाव जंगलाच्या जवळ आहे त्या गावांची नोंद घेऊन त्याचे साखळी कुंपण लावण्यात यावे अशी मागणी केली.
या प्रश्नावर उत्तर देताना वनमंत्री गणेश नाईक म्हणाले की, २००० साली वाघांची संख्या १०१ होती आता २०२५ मध्ये वाघांची संख्या ४४४ इतकी वाढली आहे. यासाठी सोलर फेन्सिंग करण्यासाठी सरकारने २०० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. साखळी कुंपण बाबत आम्ही पाठपुरावा करू असे आश्वासन दिले.
त्यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले की, वाघ आणि बिबट्यांच्या हल्ल्यामुळे जीवितहानी होत आहे, याबाबत विविध लोकप्रतिनिधी यांनी चिंता व्यक्त केल्याने या प्रश्नावर संबंधित लोकप्रतिनिधींचे विशेष बैठक विधानासभा अध्यक्षांच्या दालनात लावण्यात येणार असे निर्देश दिले.
Marathi e-Batmya