मुंबई: प्रतिनिधी
मागील दोन महिन्याहून अधिक काळ लग्नाची तयारी असूनही लॉकडाऊन आणि संचारबंदी मुळे लग्न करण्यास विवाहोत्सुकांना अडचणींचा सामना करावा लागत होता. अखेर विवाहोत्सुक आणि सामाजिक गरज लक्षात घेवून ५० नागरिकांच्या उपस्थितीत लग्न समारंभ करण्यास राज्य सरकारने परवानगी दिल्याची माहिती आपत्ती, मदत व पुर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.
कोरोना विषाणूचा राज्यातील वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता लॉकडाऊन दरम्यान गर्दी टाळण्याच्या दृष्टीने केवळ ५० लोकांच्या मर्यादेत सोशल डिस्टंसिंग पाळत लग्न समारंभ साजरा करण्याची परवानगी देण्यात आली. सोशल डिस्टंसिंग पाळून खुले लॉन, विना वातानुकूलित मंगल कार्यालय, हॉल/सभागृह येथे लग्न समारंभ पार पाडण्यास परवानगी देण्याबाबतच्या विविध मागण्या शासनाकडे करण्यात आल्या होत्या या मागण्यांचा विचार करून शासनाने या बाबतीत निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.
नागरिकांची मागणी विचारात घेता तसेच आता पावसाळा सुरू झाला असल्यामुळे, खुले लॉन, विना वातानुकूलित मंगल कार्यालय, हॉल, सभागृह, घर व घराच्या परिसरात ५० लोकांच्या मर्यादेत सोशल डिस्टेंसिंग तसेच कोविड-19 संदर्भात वेळोवेळी निर्गमित केलेल्या सूचनांचे पालन करण्याच्या अटीवर लग्न समारंभ पार पाडण्यास परवानगी दिल्याचे त्यांनी सांगितले.
Marathi e-Batmya