मुंबईः विशेष प्रतिनिधी
राज्याचा कारभार हाकणाऱ्या मंत्रालयात सध्या विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या उत्तुंग व्यक्तीमत्वांची आवकजावक वाढली आहे. त्यातच राज्य मंत्रीमंडळातील गृहनिर्माण विभागाच्या एका वरिष्ठ मंत्र्याने त्यांच्या पक्षश्रेष्ठींच्या जवळच्या व्यक्तीला त्याच्या मर्जीने शासकिय निर्णय घेण्यास सुरुवात केल्याने या बॉस नामक व्यक्तीच्या इशाऱ्यावर विभागाचा कारभार चालणार की जनतेसाठी चालणार असा प्रश्न मंत्रालयातील अधिकाऱ्यांना पडला असल्याचे धक्कादायक माहिती हाती आली आहे.
बांधकाम क्षेत्रातील हे सदगृहस्थ असून त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात बॉस म्हणून ओळखले जाते. तसेच या महाशयांची मोठी कंपनी असून या कंपनीने वांद्रे-कुर्ला संकुलातील म्हाडाच्या एका भूखंडावर फार वर्षापासून डोळा ठेवला आहे. त्या भूखंडात त्यांनी रस दाखविला म्हाडाकडूनही या भूखंडाच्या बाबत अद्याप कोणतीही ठाम भूमिका घेतली नाही. याशिवाय या महाशयांच्या कंपनींने राज्यातील गत सरकारच्या काळात अर्थात भाजपा सरकार सत्तेवर असताना भाजपाच्या तत्कालीन मुंबई अध्यक्ष आणि मंत्र्यांच्या मार्फत वरळी, कुलाबा, वांद्रे येथील म्हाडाच्या अखत्यारीत असलेल्या ट्रान्झीट कँम्प घशात घालण्याचा प्रयत्न केल्याची माहिती मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
तसेच या महाशंयानी २ जी स्पेक्ट्रम घोटाळ्याप्रकरणी तिहार तुरूंगाची वारीही केली आहे. त्यानंतर त्यांचा मुंबईतील बांधकाम व्यवसाय थंडावला असल्याने त्यास गती देण्यासाठी मुंबईतील म्हाडाच्या आरआर बोर्डांच्या अनेक वसाहती आणि एसआरए प्रकल्पांच्या पुनर्विकासात रस दाखविला आहे. त्यामुळे त्यांच्यावर सध्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून खास मेहेरबानी दाखविली जात आहे. त्यांना हव्या असल्याप्रमाणे कायद्यातील तरतूदी आणि सवलती देण्यासाठी या महाशंयाबरोबर मंत्री महोदय बैठका घेत असून त्यात ठरणाऱ्या गोष्टींच्या अंमलबजावणीसाठी संबधित विभागाच्या अधिकाऱ्यांना त्यानुसार प्रस्ताव तयार करण्याचे आदेश देण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.
याशिवाय या महाशयांच्या उपस्थितीत शासकिय अधिकाऱ्यांच्या बैठकाही घेण्यात आहेत. या बैठकांमध्ये एखाद्या अधिकाऱ्याने दुरूस्ती अथवा असमर्थता दाखविल्यास त्या अधिकाऱ्यास फारसे बोलू दिले जात नसल्याचेही त्यांनी शेवटी सांगितले.
Marathi e-Batmya