राज्यातील सत्तास्थापनेचा घोळ संध्याकाळी सुटणार भाजपा, शिवसेनेचे डोळे लागले शरद पवार-सोनिया गांधींच्या भेटीकडे

मुंबईः विषेश प्रतिनिधी
राज्यातील सत्ता स्थापनेचा घोळ आता दिल्ली दरबारी पोहोचला असून हा घोळ सोडविण्यासाठी भाजपाचे विधिमंडळ नेते देवेंद्र फडणवीस हे अमित शाह यांना सकाळी भेटले, तर संध्याकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्या भेटीसाठी दिल्लीत पोहोचले आहेत. त्यामुळे पवार आणि गांधींच्या भेटीनंतरच राज्यातील सत्तेचा घोळ मिटणार असल्याची अटकळ राजकिय वर्तुळात मानली जात आहे.
विधानसभा निवडणूकीचे निकाल जाहीर होवून १० दिवस झाले तरी भाजपा-शिवसेनेकडून सत्ता स्थापन करण्याऐवजी शिवसेनेने सत्तेच्या समसमान वाटपाच्या मुद्यावरून शिवसेनेला चांगलेच कोंडीत पकडले. तसेच भाजपाशिवाय राज्यात सत्ता स्थापनेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या संपर्कात शिवसेना राहीली आहे. विशेष म्हणजे या राजकिय खेळीला काँग्रेसनेही उघडपणे पाठिंबा देण्यास सुरूवात केल्याने भाजपाची विशेषतः देवेंद्र फडणवीस यांची चांगलीच राजकिय दमछाक होत असल्याचे दिसून येत आहे.
भाजपाला राज्यातील सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेनेकडे स्वतःचे ५६ आमदार ७ अपक्षांचा पाठबळ आहे. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने पाठिंबा दिल्यास दोन्ही पक्षांचे ९८ आमदार (५४+४४) मिळून १६१ चे संख्याबळ सहजरित्या गाठून राज्यात शिवसेना प्रणित काँग्रेस, राष्ट्रवादीचे सरकार स्थापन करण्यासाठी शिवसेनेकडून प्रयत्न सुरु असल्याचे शिवसेनेतील एका बड्या नेत्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.
शिवसेनेच्या या भूमिकेमुळे भाजपाचीही राजकिय कोंडी होत असल्याने सत्तेत बसायचे की सर्वाधिक जागा मिळून विरोधात बसायचे असा प्रश्न भाजपासमोर निर्माण झाला आहे. त्यामुळे सत्ता स्थापनेसंदर्भात भाजपामधील कोणत्याही नेत्याने मत व्यक्त करायचे नाही अशी भूमिकाही भाजपाने स्विकारली आहे. त्यातच आज दिल्लीत शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्या भेटीत सत्तास्थापनेचा काय निर्णय होता तोपर्यंत वाट पहायचे असा निर्णय भाजपाच्या नेत्यांनी घेतला आहे. त्यामुळे आज होणाऱ्या पवार-गांधींच्या भेटीनंतर राज्यात सत्ता स्थापन करायचा दावा करायचा की नाही याबाबत भूमिका जाहीर करण्याचे पक्षनेत्यांनी ठरविल्याची माहिती भाजपाच्या एका पदाधिकाऱ्याने दिली.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री डी के शिवकुमार यांच्या नेतृत्वाखालील १९ जणांनी घेतली मंत्रीपदाची शपथ २० जणांच्या मंत्रिमंडळातील सहकारी एका महिला आमदाराने घेतली नाही मंत्री पदाची शपथ

सोमवारी मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या नेतृत्वाखालील कर्नाटक सरकारमध्ये काँग्रेसच्या एकोणीस आमदारांनी मंत्री म्हणून शपथ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *