अमित शाह यांची मोठी घोषणा, लसीकरण मोहिम संपताच सीएए कायदा लागू मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे विरोधक सुवेंदू अधिकारी यांची माहिती

भारताचे नागरीक असल्याचे सिध्द करण्यासाठी देशात नागरिकत्व सुधारणा कायदा अर्थात सीएए कायदा लागू करण्यावरून काही वर्षापूर्वी मोठा गदारोळ उडाला होता. मात्र आता पुन्हा एकदा हा कायदा लागू करण्यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मोठे विधान केले असून देशात लसीकरण मोहिम संपताच नागरिकत्व लागू करणार असल्याचे जाहिर केले.

पश्चिम बंगाल मधील मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे कट्टर विरोधक तथा बंगालच्या विधानसभेत विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनी आज संसदेत अमित शाह यांची भेट घेतली. त्यानंतर ते प्रसारमाध्यमाशी बोलताना अमित शाह यांनी केलेल्या विधानाची माहिती दिली.

यावेळी त्यांनी अमित शाह यांच्यासोबत पश्चिम बंगालमधील भाजपाच्या कामकाजाबाबत तसंच समस्यांबाबत चर्चा केली. या भेटीनंतर बोलताना सुवेंदू अधिकारी यांनी, अमित शाह यांनी कोरोना लसीकरण मोहीम संपल्यानंतर प्रलंबित असलेला नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) लागू केला जाईल असं आश्वासन दिल्याची माहिती दिली.

सुवेंदू अधिकारी यांनी या भेटीत अमित शाह यांच्यासमोर सत्ताधारी तृणमूल काँग्रेससोबत सुरु असलेल्या राजकीय लढाईसंबंधीही अनेक मुद्दे मांडले. आपण अमित शाह यांच्याकडे भ्रष्टाचार प्रकरणी कारवाई कऱण्यासाठी तृणमूलच्या १०० नेत्यांची यादी दिल्याचे त्यांनी सांगितले.

११ डिसेंबर २०१९ ला संसदेत सीएए संमत करण्यात आला आणि दुसऱ्या दिवशी अधिसूचना जारी करण्यात आली. केंद्र सरकारने अद्याप कायद्यासाठीची नियमावली तयार केलेली नाही. अनेक विरोधी पक्षांनी सीएएला विरोध केलेला असतानाही, अमित शाह यांनी याची अमलबजावणी करणार असल्याचे स्पष्ट केले.

धार्मिक छळाला कंटाळून पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या देशांतून ३१ डिसेंबर २०१४ पर्यंत भारतात आलेल्या हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारशी व ख्रिस्ती समुदायाच्या लोकांना बेकायदा स्थलांतरित मानले जाणार नाही आणि त्यांना भारतीय नागरिकत्व दिले जाईल, अशी तरतूद सुधारित नागरिकत्व कायद्यात करण्यात आली आहे.

श्रीलंकेतील तमिळ, म्यानमारमधील मुस्लीम तसेच, पाकिस्तानातील मुस्लिमांतील अन्य समुदायातील व्यक्तींना या कायद्याचा लाभ मिळणार नाही.

ही दुरुस्ती घटनेच्या सहाव्या अनुसूचित समाविष्ट केलेल्या आसाम, मेघालय, मिझोराम आणि त्रिपुरा या राज्यांतील आदिवासी भागांना, तसेच बंगाल ईस्टर्न फ्रंटियर रेग्युलेशन, १८७३ मध्ये अधिसूचित केलेल्या भागांना लागू असणार नाही.
सध्या कोणत्याही परदेशी व्यक्तीला भारताचं नागरिकत्व मिळवण्यासाठी भारतामध्ये कमीत कमी ११ वर्ष राहणं आवश्यक आहे. नागरिकत्व दुरुस्ती विधेयकामध्ये ही अट शिथिल करून ती सहा वर्ष करण्यात आली आहे.

About Editor

Check Also

हिमंता बिस्वा सरमा यांचा गंभीर आरोप, गौरव गोगाई आणि त्यांच्या पत्नीचे पाकिस्तानी एजंटशी संबध आसाम निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते गोगाई यांच्यावर आरोप

काँग्रेस खासदार गौरव गोगोई, त्यांची ब्रिटिश पत्नी एलिझाबेथ कोलबर्न आणि पाकिस्तानी नागरिक अली तौकीर शेख …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *