रायगड, पुणे घाट परिसरात रेड अलर्ट; ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट आठ जिल्ह्यांसह सातारा, कोल्हापूर घाट परिसरात ऑरेंज

रायगड जिल्हा आणि पुणे घाट परिसरात २८ सप्टेंबर २०२५ रोजीसाठी रेड अलर्ट तर पालघर, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांसह सातारा घाट व कोल्हापूर घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे, असे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून कळविण्यात आले आहे.

सचेतच्या माध्यमातून नागरिकांना सतर्कतेच्या पूर्व सूचना देण्यात येत असून भारतीय हवामान विभाग आणि राष्ट्रीय रिमोट सेन्सिंग केंद्र या केंद्रीय संस्था सोबत सतत संपर्क साधून पुढील हवामानाच्या अंदाजाची माहिती घेऊन सर्व जिल्ह्यांना प्रसारित करण्यात येत आहे.

सोलापूर जिल्ह्यात सीना नदी वडकबाळ येथे इशारा पातळीच्यावर वाहत आहे. तर टाकळी येथे भीमा नदी इशारा पातळीच्यावर वाहत आहे. सीना नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने स्थानिक पथके तसेच राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची दोन पथके तैनात करण्यात आली आहेत. आवश्यकतेनुसार नागरिकांचे स्थलांतर करण्याची दक्षता घेण्यात येत आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यामध्ये अतिवृष्टी झाली असून खैरी धरणातून सकाळी ९.३० पासून १६,७४३ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. आवश्यकतेनुसार नागरिकांचे स्थलांतर करण्याची दक्षता घेण्यात येत आहे. जामखेड तालुक्यातील दरडवाडी पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे सुरक्षास्तव जामखेड ते खर्डा वाहतूक बंद करण्यात आली आहे.

धाराशीव जिल्ह्यात परांडा आणि भूम येथे मुसळधार पावसामुळे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असल्याने आवश्यकतेनुसार नागरिकांचे स्थलांतर करण्याची दक्षता घेण्यात येत आहे. खबरदारीचा उपाय म्हणून राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची दोन पथके पुणे येथून रवाना करण्यात आली आहेत.

बीड जिल्ह्यात २० सर्कलमध्ये अतिवृष्टीची नोंद (६५ मि.मी.) झाली असल्याने आवश्यकतेनुसार नागरिकांचे स्थलांतर करण्याची दक्षता घेण्यात येत आहे.

लातूर जिल्ह्यात सरासरी ७५.३ मि.मी. इतक्या पावसाची नोंद झाली असल्याने अहमदपूर तालुक्यात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. छिलखा बॅरेज येथे चार नागरिकांना वाचवण्यासाठी स्थानिक पथकाच्या सहाय्याने बचाव कार्य सुरु आहे. जिल्ह्यात ६० रस्ते सुरक्षास्तव बंद करण्यात आले आहेत. तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे एक पथक नांदेडहून लातूर, अहमदपूरसाठी पाठविण्यात येत आहे.

राज्यात मागील २४ तासात सर्वाधिक पाऊस झालेले जिल्हे:- लातूर जिल्हा ७५.३ मि.मी., हिंगोली ६६.२ मि.मी., परभणी ५४.९ मि.मी., धाराशिव ५४.५ मि.मी. आणि गडचिरोली जिल्ह्यात ५३.५ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तसेच वर्धा जिल्ह्यात वीज पडून दोन व्यक्तींचा मृत्यू तर एक व्यक्ती जखमी झाली आहे. नांदेड जिल्ह्यात वीज पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाला असल्याचेही राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून कळविण्यात आले आहे.

About Editor

Check Also

आयएमडीचा इशारा, ऑक्टोंबर महिन्यातही सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस आयएमडीचे महासंचालक मृत्यूंजय महापात्रा यांची माहिती

भारतातील पावसाळ्यात ऑक्टोबरमध्ये सामान्यपेक्षा १५ टक्के जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे, अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *