सोमवारी लोकसभेचे अधिवेशन सुरु झाल्यानंतर प्रश्नोत्तराचा तास लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनी पुकारला. यावेळी एनईईटी परिक्षेतील पेपर लिक प्रश्नी विरोधक आणि शिक्षण मंत्री धर्मेद्र प्रधान यांच्यात चांगलाच सामना झाला. यावेळी काँग्रेसचे खासदार आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी राष्ट्रीय पात्रता कम प्रवेश परीक्षा (NEET) २०२४ मधील कथित लीकवरून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या कार्यशैलीवरच बोट ठेवत निरूत्तर केले. त्यामुळे पेपर फुटीवरून रंगलेल्या वादावादीची चांगलीच चर्चा संसदेत सुरु झाली.
यावेळी राहुल गांधी म्हणाले की, संपूर्ण देशासाठी हे उघड आहे की आपल्या परीक्षा प्रणालीमध्ये एक अतिशय गंभीर समस्या आहे, फक्त एनईईटी NEET मध्येच नाही तर सर्व प्रमुख परीक्षांमध्ये, शिक्ष मंत्री (धर्मेंद्र प्रधान) स्वतःला सोडून सगळ्यांवरच आरोप केले आहेत. इथे काय चालले आहे याची मूलभूत माहिती त्यांना आहे असे मला वाटत नाही, असा खोचक टीपण्णी केली.
त्याचबरोबर राहुल गांधी यांनी भारतीय परीक्षा प्रणालीच्या अखंडतेबद्दल चिंता व्यक्त करत दावा केला की लाखो विद्यार्थ्यांचा विश्वास आहे की ते फसवले गेले आहेत. तुम्ही श्रीमंत असाल आणि तुमच्याकडे पैसा असेल तर तुम्ही भारतीय परीक्षा प्रणाली विकत घेऊ शकता, असा लाखो लोकांचा विश्वास झाला आहे आणि विरोधकांचीही हीच भावना आहे, असे सांगत त्यांनी या विषयावर स्वतंत्र एकदिवसीय चर्चेची मागणी केली.
त्यावर धर्मेंद्र प्रधान यांनी मात्र राहुल गांधी यांच्या आरोपांचा प्रतिवाद करताना असा दावा केली की, त्यांच्या नजरेतून पेपर फुटला नाही. गेल्या ७ वर्षांत पेपर फुटल्याचा कोणताही पुरावा सापडला नाही. हे (NEET) प्रकरण सर्वोच्च न्यायालयासमोर सुरु आहे. मी पूर्ण जबाबदारीने सांगू शकतो की एनटीए NTA नंतर २४० हून अधिक परीक्षा यशस्वीपणे पार पडल्या असल्याचे सांगितले
त्यावर राहुल गांधी यांनी पुन्हा शिक्षण मंत्री धर्मेद्र प्रधान यांना प्रश्न केला की, ही पेपर फुटीची (NEET) एक पद्धतशीर समस्या असल्याने, या समस्येचे निराकरण करण्यासाठी तुम्ही नेमके काय करत आहात?
त्यावर उत्तरादाखल धर्मेंद्र प्रधान म्हणाले, फक्त आरडाओरडा करून खोटे सत्य बनणार नाही. देशाची परीक्षा पद्धत रद्दबातल आहे, असे विरोधी पक्षनेते म्हणतात, ही बाब अत्यंत निषेधार्ह आहे, सरकारने स्पर्धा परीक्षांमधील गैरप्रकार आणि अनियमितता रोखण्यासाठी नवीन कायदा आणला आहे. तत्सम विधेयके पूर्वीच्या यूपीए राजवटीत मांडण्यात आली होती, परंतु सत्ताधारी काँग्रेसने “दबावाखाली” ती रद्द केली, असा प्रत्यारोपही धर्मेंद्र प्रधान यांनी केला.
समाजवादी पक्षाचे खासदार अखिलेश यादव यांनी सरकारच्या या मुद्द्यावर टीका करत म्हणाले की, हे सरकार पेपरफुटीचा विक्रम करेल, असे दिसते असा टोला लगावत अशी काही केंद्रे आहेत जिथे २,००० हून अधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. जोपर्यंत हे मंत्री (शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान) आहेत तोपर्यंत विद्यार्थ्यांना न्याय मिळणार नाही, असा आरोपही यावेळी केला.
The Education Minister – far removed from India’s ground reality – claims there have been no paper leaks in the last 7 years.
The unfortunate truth is that the Indian examination system is up for sale to the rich, causing millions of students to suffer.
The issue is systemic… pic.twitter.com/PJpdjKK3jn
— Rahul Gandhi (@RahulGandhi) July 22, 2024
अखिलेश यादव यांच्या आरोपा उत्तर देताना धर्मेंद्र प्रधान म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार निकाल जाहीर करण्यात आले आहेत. मला राजकारण करायचे नाही, पण अखिलेश यादव प्रभारी असताना किती पेपर फुटले याची यादी माझ्याकडे आहे, असा दावा करत अखिलेश यादव यांना निरूत्तर करण्याचा प्रयत्न केला.
काँग्रेसचे खासदार मणिकम टागोर यांनी प्रश्न केला की मंत्री जबाबदारी स्वीकारतील आणि मोठ्या वादात राजीनामा देण्याचा विचार करतील का, तेव्हा प्रधान म्हणाले की, मी माझ्या नेत्याच्या, पंतप्रधानांच्या दयेवर आहे. जेव्हा जेव्हा जबाबदारी येते तेव्हा सरकार त्याला एकत्रितपणे उत्तरदायी असते असेही यावेळी सांगितले.