वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल, ज्या माशेलकर समितीचा संदर्भ दिला जातोय ती विभागाची नाही सत्ताधारी आणि सरकारचे दलाल खोट्या अफवा पसरवतायत

भाजपाच्या हिंदी सक्तीच्या अजेंडाविरुद्ध आज उभा महाराष्ट्र एकवटला असताना ही एकजूट होऊ नये आणि भाजपच्या महाराष्ट्र व मराठी द्वेषी धोरणाविरुद्ध मराठी माणूस लढा उभारू नये यासाठी सत्ताधारी मंडळी आणि सरकारचे दलाल खोट्या अफवा पसरवून तसेच चुकीचा संदर्भ देऊन कसं उपद्रव माजवत आहेत, असा आरोप मुंबई काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी केला.

वर्षा गायकवाड पुढे बोलताना म्हणाल्या की, आपल्या बनवेगिरीवर पांघरूण घालण्यासाठी आता ही अफवा जाणीवपूर्वक पसरवली जात आहे की, महाविकास आघाडी सरकार असताना शालेय शिक्षण विभागानं त्रिभाषी सूत्र स्वीकारलं होतं. मात्र हे साफ चुकीचं आहे. मुळात ज्या डॉ. रघुनाथ माशेलकर समितीचा संदर्भ दिला जात आहे, ती समिती शालेय शिक्षण विभागानं नेमलीच नाही तर तो स्वीकारण्याचा प्रश्न येतोच कुठे असा सवालही यावेळी केला.

पुढे बोलताना वर्षा गायकवाड म्हणाल्या की, नवीन शैक्षणिक राष्ट्रीय धोरण २०२० (NEP) मध्ये उच्च व तंत्र शिक्षण विभागाशी निगडीत कार्यांबाबतची कार्यवाही करण्यासाठी त्या काळात ही समिती नेमण्यात आली होती. शालेय शिक्षण विभागासाठी नाही. उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे तत्कालीन मंत्री उदय सामंत हे पण आपल्या सहकाऱ्यांसह याबद्दल भ्रम पसरवताहेत हे खरंतर दुर्दैवी असल्याची टीकाही यावेळी केली.

वर्षा गायकवाड म्हणाल्या की, मी शालेय शिक्षण मंत्री असताना त्रिभाषी सूत्र आणि एनईपी NEP च्या अन्य काही बाबी महाराष्ट्राच्या हिताच्या नसल्यानं आम्ही त्याकाळात शालेय शिक्षण विभागाशी निगडीत विविध शैक्षणिक व प्रशासकीय बाबींसाठी आयुक्त शिक्षण यांच्या नियंत्रणाखाली विविध अभ्यास गट नेमले होते. ज्याचा शासन निर्णय GR २४ जून, २०२२ रोजी निघाला. तेव्हा त्रिभाषी सूत्र आम्ही स्वीकारल्याचा आरोपच साफ चुकीचा आहे. हे लबाड सरकार धादांत खोटं बोलतंय असा आरोपही यावेळी केला.

पुढे बोलताना वर्षा गायकवाड म्हणाल्या की, याउलट महाराष्ट्राची अस्मिता, अभिमान आणि ओळख ही मराठी भाषेतच आहे आणि ती कायम मराठीच राहिली पाहिजे, यासाठी मी शिक्षण मंत्री असताना आम्ही महाराष्ट्रातील सर्व माध्यमांच्या, सर्व मंडळाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये किमान इ. ८ वीपर्यंत मराठी भाषा अध्यापन व अध्ययन सक्तीचा करण्याचा अधिनियम पारित केला. यासाठी १ जून २०२० रोजी एक शासन निर्णय GR काढला आणि ३० सप्टेंबर २०२० रोजी त्याच्या अंमलबजावणीसाठी समिती नेमल्याचेही यावेळी सांगितले.

वर्षा गायकवाड पुढे म्हणाल्या की, मराठी भाषेच्या प्रचार आणि प्रसारासाठी आमच्या काळात शालेय शिक्षण विभागानं पुढाकार घेऊन आपली चर्नीरोड येथील जागा मराठी भवनाच्या निर्माणासाठी दिली. तो प्रकल्पही या सरकारनं रखडवला. खोटं बोलावं पण किती रेटून बोलावं याला काही मर्यादा आहेत. आपल्या महाराष्ट्रात भाजपा मराठी भाषेवर आघात करण्याचं काम करत असल्याचा आरोपही यावेळी केला.

वर्षा गायकवाड पुढे बोलताना म्हणाल्या की, एनईपी NEP २०२० मध्ये अनेक बाबी महाराष्ट्र हिताच्या नाहीत, हे आम्ही लक्षात आणून देखील दिलं होतं. पण एकनाथ शिंदे यांच्या सरकारनं दिल्ली पुढे झुकून फक्त पी-श्री PM-Shri योजनेअंतर्गत काही फंड मिळावा यासाठी महाराष्ट्र आणि मराठी हित गहाण ठेऊन, एनईपी NEP जसाच्या तसा मान्य असल्याचा लेखी करार केंद्रा बरोबर केला. हे केल्यामुळेच आता राज्याला भोगावं लागत आहे. या सगळ्याला तेव्हाचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, सध्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे आणि महायुती सरकारचे पूर्व आणि सध्याचे मुख्यमंत्री जबाबदार असल्याचा आरोपही यावेळी करत हिंदी भाषेला आमचा विरोध नाही, पण हिंदी सक्ती आम्ही महाराष्ट्रावर लादू देणार नाही. माझा मुख्यमंत्री महोदयांना थेट सवाल आहे की, महाराष्ट्र आणि मराठीबाबत इतका द्वेष का? असा सवालही शेवटी केला.

 

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, राहुल गांधी भारतीय जनता पक्षाच्या धमक्यांना घाबरणारे नेते नाहीत मुंबई विमानतळावर राहुल गांधी यांचे काँग्रेस नेते व कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत

जननायक राहुल गांधी हे देशहितासाठी निडर आणि बेधडकपणे काम करत आहेत. देशातील लोकशाही व संविधान …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *