हर्षवर्धन सपकाळ यांची आशा, अमेरिका इस्त्राईल इराण युद्ध संपून शांतता निर्माण व्हावी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी घेतली इराणचे कॅान्सुल जनरल सईद रझा मोसायब मोतलाघ यांची भेट

अमेरिका इस्त्राईल इराण यांच्यात सुरु असलेल्या युद्धाचा जगभर परिणाम होत आहे. या युद्धजन्य परिस्थितीमुळे भारतातही गॅस व इंधन तुटवडा जाणवू लागला आहे. हे युद्ध लवकर संपून आशियात शांतता निर्माण व्हावी, अशी सदिच्छा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केली.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज इराणच्या कॉन्सुलेटला भेट देऊन मुंबईतील इराणचे कॅान्सुल जनरल सईद रझा मोसायब मोतलाघ यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी त्यांच्यासोबत प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस धनंजय शिंदे आणि सामाजिक कार्यकर्ते फिरोज मिठीबोरवाला उपस्थित होते.

या भेटीनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, निमंत्रणाच्या अनुषंगाने झालेल्या या भेटीदरम्यान इराणचे सर्वोच्च नेते दिवंगत अयातुल्ला अली खामेनी यांच्या निधना बद्दल तसेच  हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या सैनिक व नागरिक, विशेषता १६५ शाळकरी मुली आणि १४ शिक्षकांबद्दल आणि दोन्ही बाजूच्या मृत्युमुखी पडलेल्यांप्रती शोक संवेदना व्यक्त केल्या. या कठीण काळात इराणच्या जनतेसोबत एकात्मता व्यक्त करत संवेदना व्यक्त केल्या. युद्ध लवकरात लवकर संपावे आणि शांतता प्रस्थापित व्हावी अशी आशा व्यक्त केली.

हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले की, तासाभराच्या भेटीत भारत आणि इराण यांच्यातील प्राचीन सभ्यतागत संबंधांबद्दलही उल्लेख केला आणि या संबंधांचा भारतीय समाजावर तसेच मराठी भाषा, साहित्य आणि आपसी देवाणघेवाणीवर व संस्कृतीवर झालेल्या प्रभावाबद्दलही चर्चा झाली. खंडित झालेली इंधन पुरवठा साखळी लवकर सामान्य पातळीवर यावी अशी अपेक्षा देखील व्यक्त केली. मोसायब मोतलघ यांनी सध्याच्या युद्धपरिस्थितीबद्दल तसेच त्यामागील घटनाक्रमाबद्दल माहिती दिली. तसेच त्यांनी सध्याच्या परिस्थितीबाबत माहिती देत इराणी जनतेने दाखविलेल्या धैर्य आणि चिकाटीबद्दलही भाष्य केले. भारत बुद्धांची व गांधींची भूमी असल्याने जगात शांतता नांदावी अशी भूमिका व भावना व्यक्त केल्याचे सपकाळ यांनी सांगितले.

यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मोतलाघ यांना महात्मा गांधी यांचे आत्मचरित्र भेट दिले.

About Editor

Check Also

जयंत पाटील यांचा टोला, तुम्हाला १२ वर्षात जे करता आलं नाही, ते आम्ही तुमच्या आधी केलं सत्ताधाऱ्यांना टोले लागवत आणि चिमटे काढत जयंत पाटील यांनी कर्जमाफी योजनेची हवाच काढली !

२०१४ पर्यंत तत्कालीन राज्य शासनाने तिजोरीतून एकदाही कर्जमाफी केली नाही असे सत्ताधारी म्हणतात. २००८ मध्ये …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *