मुंबईच्या महापौरांची जबाबदारी वीज, रस्ते, पाणी आणि इतर नागरी सुविधा पुरवण्याची आहे पण त्या सतत बांगलादेशींबद्दल बोलत राहतात. भाजपच्या १२ वर्षांच्या राजवटीनंतरही जर मुंबईत बांगलादेशी राहत असतील, तर तो केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दोष आहे. दोन्ही गृहमंत्री अपयशी ठरले आहेत, अशावेळी महापौर रितु तावडे यांनी अमित शाह व देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा मागावा, असे खोचक आव्हान मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी दिले.
महापौर रितु तावडे यांच्या विधानाचा खरपूस समाचार घेत खासदार वर्षा गायकवाड पुढे म्हणाल्या की, १२ वर्षांपासून भारतीय जनता पक्षाचे सरकार केंद्रात सत्तेत आहे, देश मोदींच्या हातात मजबूत आहे असा दावा भाजपा करत असते तर राज्यात ही फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपाचे सरकार आहे असे असताना बांग्लादेशी नागरिकांचा प्रश्न येतोच कसा. हे बांग्लादेशी व रोहिंग्या भारतात आलेच कसे. अवैध बांग्लादेशी लोक भारतात येतात, चीन आक्रमण करून भारताचा भूभाग बळकावते याचा अर्थ नरेंद्र मोदी सरकार काही काम करत नाही, आपल्या सीमा सुरक्षित नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना हा प्रश्न विचारणे संयुक्तिक ठरेल पण महापौर मात्र काँग्रेस पक्षाला दोष देत आहेत. अजून किती दिवस भाजपा स्वतःच्या अपयशाचे खापर काँग्रेस वर फोडणार आहे, त्यामुळे काँग्रेसला दोष देणे थांबवा व कठोर कारवाई करा असे आवाहनही यावेळी केले.
जनतेच्या प्रश्नावरून लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी राहुल गांधी यांच्यावर टीका..
वर्षा गायकवाड पुढे बोलताना म्हणाल्या की, एलपीजी गॅसची देशात टंचाई आहे, लोकांना गॅस सिलेंडर साठी रांगा लावाव्या लागतात. हॉटेल व छोटे व्यवसाय गॅस अभावी बंद पडत आहेत,. मुंबईतही छोट्ये व्यवसाय बंद करण्याची वेळ आली आहे. गॅस टंचाई व एपस्टीन फाईल वरून देशातील जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी भाजपाचे नेते विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्यावर पातळी सोडून टीका करत आहेत. भाजपाच्या नेत्यांनी राहुल गांधी यांना कितीही बदनाम केले तरी काँग्रेसला त्याचा काहीही फरक पडत नाही. जनतेच्या प्रश्नावर आम्ही आवाज उठवत राहु. राहुल गांधी यांच्यावर बोलण्याआधी अशा वाचाळवीरांनी आपला इतिहास पहावा. राहुल गांधी यांच्यावर बोलण्याची त्यांची लायकी नाही असा टोलाही यावेळी लगावला.
Marathi e-Batmya