उद्धव ठाकरे यांच्या सततच्या आरोपावर भाजपाचे बावनकुळे म्हणाले, हिंमत असेल तर एकदा… हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे सुत आहात तर सांगाच तुमचे सुत कोणाशी जुळले

शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सध्या विदर्भ दौऱ्यावर असून यवतमाळ मधील दिग्रस येथे काल भाषण करताना पोहरादेवीची शपथ घेत सांगितलं होतं की, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत २०१९ च्या विधानसभा निवडणुकीआधी मुख्यमंत्रीपदाबाबत अडीच वर्षांचा फॉर्म्युला ठरला होता. त्यांनी जगदंबेची शपथ घेऊनही हीच गोष्ट सांगितली. पण दुसरीकडे भाजपाकडून उध्दव ठाकरे यांनी केलेल्या दाव्याचे खंडन केलं जातंय. मुख्यमंत्रीपदाबाबत तसा काहीच फॉर्म्युला ठरला नव्हता, असं भाजपा नेत्यांकडून स्पष्ट करण्यात येत आहे. उद्धव ठाकरे यांनी काल पुन्हा याबाबतचा उल्लेख केल्यानंतर आता भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांना शपथ घेऊन खुलासा करण्याचं आव्हान दिलं.

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, उद्धवजी, केंद्र सरकारच्या लोकाहिताच्या योजनांना फसव्या, बोगस म्हणून तुम्ही बांधावर, टपरीवर चर्चा करणार असाल तर, होऊ द्या चर्चा. पण, सध्या एकच चर्चा आहे. ती म्हणजे, तुम्ही जागोजागी देवाधिकांच्या “शपथा” का घेताहात? मग, असेल हिंमत तर एकदा शपथेवर सांगाच, असं म्हणत चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांना थेट आव्हान दिले.

त्यानंतर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर देवेंद्र फडणवीस यांचे फोन तुम्ही का घेतले नाहीत ? घ्या, जगदंबेची शपथ! वंदनीय हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे “सुत ” आहात, तर आता सांगाच तुमचे “सुत” कोणाशी जुळले होते? घ्या शपथ आणि कळू द्या तुमची वचनबद्धता, असं आव्हानही चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.

चंद्रशेखर बावनकुळे यांनी आणखी एक व्हिडीओ ट्विट करत उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.  उद्धव ठाकरे यांचं त्यांचा पक्ष वाढवणं हे कामच आहे. पण ते विदर्भात येवून ज्या पद्धतीने बोलत आहेत, खरंतर अडीच वर्षांपूर्वी मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांनी विदर्भाच्या वैधानिक विकास मंडळाला स्थगिती दिली, असा आरोप चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.

नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन घेतले नाही, डीपीसीचे पैसे कमी केले, सिंचन आणि रस्त्यांचा बॅकलॉग वाढला. सत्ता असताना विदर्भाच्या विकासाकडे लक्ष दिले नाही. विदर्भाची जनता त्यांच्यावर नाराज आहे, असं म्हणत चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.

About Editor

Check Also

रामदास आठवले यांचे निर्देश, महापरिनिर्वाण दिनानिमित्त अनुयायांसाठी उत्तम दर्जाच्या सुविधा पुरवा ६९ व्या महापरिनिर्वाण दिना निमित्त आयोजित बैठकीत दिले निर्देश

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी येथे देशभरातून लाखो अनुयायी अभिवादन करण्यासाठी येतात. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *