पशुसंवर्धन सेवेतील ३१०३ अधिकारी पदांसाठी ११ जूनला परीक्षा पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

राज्यातील पशुसंवर्धन विभागातील रिक्त पदांमुळे ग्रामीण भागातील पशुवैद्यकीय सेवांवर पडणारा ताण कमी करण्यासाठी या पदांच्या भरती प्रक्रियेला गती देण्यासाठी पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने पशुधन विकास अधिकारी, महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा गट ‘अ’च्या २ हजार ७९५ आणि सहाय्यक आयुक्त, पशुसंवर्धन गट ‘अ’च्या ३०८ पदांसाठी संगणक प्रणालीवर आधारित चाळणी परीक्षा घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. ही परीक्षा ११ जून २०२६ रोजी मुंबई, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर येथे होणार आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने याबाबत प्रसिद्धीपत्रक जारी केले असून संबंधित उमेदवारांची परीक्षा सायंकाळी ५.३० ते ७ या वेळेत होणार असल्याचे नमूद केले आहे. परीक्षेतील गुणांच्या आधारे स्वतंत्र गुणवत्ता यादी तयार करण्यात येणार असून त्यानंतर पुढील निवड प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

राज्यातील पशुसंवर्धन विभागात मोठ्या प्रमाणावर अधिकारी रिक्त असल्याने पशुवैद्यकीय सेवा, पशुधन आरोग्य तपासणी, लसीकरण आणि ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना तातडीची मदत देण्यात अडचणी येत होत्या. या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता.

या निर्णयाबाबत आनंद व्यक्त करताना पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या की, खूप दिवस झाले आपण ज्या अत्यंत आनंदाच्या बातमीची प्रतीक्षा करत आहात, ती बातमी तुम्हा सर्वांना देण्यासाठी मला आनंद होत आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत पशुधन विकास अधिकारी गट ‘अ’ या पदासाठी २७९५ तर सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन गट ‘अ’ या पदासाठी ३०८ जागांच्या परीक्षा घेण्याचा निर्णय झालेला आहे. ११ जून २०२६ रोजी ही परीक्षा आहे. एवढे सर्व अधिकारी पशुसंवर्धन खात्यात रुजू झाल्यानंतर विभागाच्या कामाला मोठा वेग मिळेल. ग्रामीण भागातील लोकांच्या आणि त्यांच्या पशुधनाची अधिक चांगली काळजी घेणे शक्य होईल.”

या भरतीमुळे राज्यातील पशुवैद्यकीय यंत्रणेला मोठे बळ मिळणार असून ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करून या परीक्षेला बसणाऱ्या सर्व परीक्षार्थींना मंत्री पंकजा मुंडे यांनी शुभेच्छा दिल्या.

About Editor

Check Also

खासदार वर्षा गायकवाड यांची मागणी, मुंबईत ४० टक्केही मॅपिंग झालेले नाही, ते पूर्ण करा

लोकशाही व्यवस्थेत निवडणुका हा एक उत्सव आहे, या उत्सवात सर्वांचा सहभाग असला पाहिजे परंतु एसआयआर मोहिम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *