हर्षवर्धन सपकाळ याचा आरोप, पालघर ते सिंधुदुर्ग पट्टा अदानी, अंबानीला आंदण देण्याचा भाजपाचा घाट राज्यातील विदारक परिस्थितीला फडणवीस सरकारच जबाबदार, महिला अत्याचार, शेतकरी आत्महत्या वाढल्या, वेगवेगळ्या गँग बनल्या

भारतीय जनता पक्षाचे सरकार लाडका उद्योगपती अदानीसाठी रेट कार्पेट टाकत आहे. मुंबईतील धारावी अदानीला विकली आहे, मुंबईतील महत्वाचे भखंड अदानीच्याच घशात घातले आहेत. नवी मुंबई विमानतळही अदानीलाच दिलेले आहे आणि आता पालघरपासून सिंधुदुर्गपर्यंतचा मोठा सागरी पट्टा सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या सरकारने अदानीच्या घशात टाकण्याचा घाट घातलेला आहे, असा घणाघाती हल्ला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.

पालघर येथे पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, शेतकऱ्यांचा विरोध असताना, आवश्यकता नसतानाही भाजपा सरकार नागपूर ते गोवा शक्तीपीठ मार्ग टाकत आहे. जेट्टीतून समुद्र किनाऱ्यापासून थेट सेंट्रल इंडियापर्यंत अदानी अंबानीला रेड कार्पेट टाकले जात आहे. गोव्यातील कोळसा व खनिजे यांचा व्यापर या दोन उद्योगपतींना सहज करता यावा आणि कोकणात सापडलेली मुबलक प्रमाणातील खनिजे अदानी, अंबानीला लुटता यावीत यासाठी हा शक्तीपीठ मार्ग बांधला जात आहे. कोकणी माणूस एकजूट करुन राहतो त्याला छेद देण्यासाठी व या लोकांना शांत बसवण्यासाठी सिंधुदुर्गातील वाचाळवीर मंत्री बेताल वक्तव्य करुन समाजात तेढ निर्मण करत आहेत. आता पालघरमध्येही असेच फासे टाकले जात आहेत, इथल्या जमिनी उद्योगपतींच्या घशात घातल्या जात आहेत. हा आदिवासी भाग आहे पण जमीन अधिगृहणामध्ये त्यांना दिलेल्या संरक्षणाची पायमल्ली सुद्धा केली जात आहे.

पुढे बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, देवेंद्र फडणवीस २०१४ ते १९ पाच वर्ष मुख्यमंत्री होते नंतर फोडाफोडी करून २.५ वर्षे ते उपमुख्यमंत्री राहिले आणि आता पुन्हा मुख्यमंत्री बनले आहेत. केंद्रात व राज्यात भाजपाचे सरकार आहे, आता मोठे बहुमत मिळाले आहे पण राज्यात विदारक परिस्थिती आहे आणि त्याला फडणवीस सरकारच जबाबदार आहे. भाजपाच्या राज्यात शेतमालाला भाव नाही, शेतकरी कर्जबाजारी आहे, बेरोजगारी प्रचंड वाढलेली आहे, कायदा सुव्यवस्थेची वाट लागली आहे. महिला अत्याचार वाढत आहेत, नव्याने गँग पुढे येते आहेत. रेती गँग, कोयता गँग, आका, खोक्या गँगनी उच्छाद मांडला आहे. सत्ताधारी पक्षातील गुंड खंडणी वसुली करताना दिसत आहेत. राज्य सरकारकडे विकास कामासाठी पैसे नहीत, अर्थसंकल्पात मोठी महसूली तुट आहे परिणामी उत्पन्न व खर्च यांचा मेळ बसत नाही.  राज्य सरकामधील प्रमुख नेते नरेंद्र मोदींचे मोठे गुणगाण गात असतात, या ट्रिपल इंजिन सरकारने दिल्लीत जाऊन राज्यासाठी स्पेशल पॅकेज आणावे पण या तिघांमध्ये ती धमक नाही अशी टीकाही यावेळी केली.

पुढे बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, विधानसभेला आघाडी होती. त्यामुळे पालघरमध्ये काँग्रेसचे उमेदवार देता आले नाही पण आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाची ताकद नक्कीच वाढेल, असा विश्वासही व्यक्त केला. यावेळी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासोबत प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन ऍड. गणेश पाटील, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रफुल्ल पाटील, मनिष गणोरे, यशवंत सिंग, विजय पाटील, पराग पाष्टे आदी उपस्थित होते.

पालघर जिल्हा दौऱ्यात काँग्रेस प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी जिल्ह्यातील प्रमुख पक्ष पदाधिकारी व ब्लॉक अध्यक्ष यांच्यासोबत संघटनात्मक बाबींसह विविध विषयावर चर्चा केली व त्यानंतर कार्यकर्ता मेळाव्याला संबोधित केले.

About Editor

Check Also

खासदार वर्षा गायकवाड यांची मागणी, मुंबईत ४० टक्केही मॅपिंग झालेले नाही, ते पूर्ण करा

लोकशाही व्यवस्थेत निवडणुका हा एक उत्सव आहे, या उत्सवात सर्वांचा सहभाग असला पाहिजे परंतु एसआयआर मोहिम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *