हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, सत्ताधा-यांकडून ‘उडता महाराष्ट्र’ बनवण्याचे षडयंत्र ड्रग्स कारखानाप्रकरणी पकडलेल्या ४३ पैकी ४० बंगाली व बांग्लादेशी कामगारांना कोणाच्या दबावाखाली सोडले?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचं वाटोळं होत असल्याची नवनवी उदाहरणं सातत्याने समोर येत आहेत. शासकीय जमिनींच्या विक्रीच घोटाळे, टेंडरमधील कमिशन, समृद्धी शक्तीपीठ महामार्गातील भ्रष्टाचारातून कमावलेलं पैसा कमी पडू लागल्याने सत्ताधारी आपल्या जवळच्या लोकांमार्फत अंमली पदार्थांचे कारखाने काढून राज्यातील युवा पिढीला व्यसनी बनवत आहेत. नगरपालिका निवडणुकीत या ड्रग्सच्या माध्यमातून कमावलेल्या पैशाचा महापूर आणून उडता महाराष्ट्र बनविण्याचा घृणास्पद प्रकार सुरु आहे, अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.

टिळक भवन येथे पत्रकार परिषदेला संबोधित करताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या साता-यातील दरे गावातील घरापासून हाकेच्या अंतरावर अंमली पदार्थांचे उत्पादन करणारा कारखाना सुरु होता. या प्रकरणात दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या जवळच्या लोकांच्या या प्रकरणात सहभाग असल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या काही आरोपीला सोडून दिले. काही बंगाली आणि बांग्लादेशी कामगारांना अटक करून मुख्य सुत्रधाराला सोडून देण्याचे प्रयत्न सुरु आहेत. ड्रग्स निर्मिती करणाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या महायुती सरकारने सातारा ड्रग्स फॅक्टरी प्रकरणी पुढील प्रश्नांची उत्तरे द्यावीत…

१. पश्चिम बंगाल व बांग्लादेशचे कामगार इतक्या दुर्गम ठिकाणी कोणाच्या मदतीने वास्तव्यास थांबले?

२. ज्या ठिकाणी ड्रग्स निर्मिती सुरु होती त्या इमारतीच्या मालकाकडून ओंकार दिघे याने एकनाथ शिंदेच्या पक्षाचे नगरसेवक प्रकाश शिंदे यांच्या कामासाठी जागा वापरण्यास मागितली होती, हे स्पष्ट झाल्यावर ओंकार दिघे याला ड्रग्स निर्मिती स्थळावरच ताब्यात घेण्यात आले होते, परंतु त्याला कोणाच्या दबावामुळे सोडण्यात आले?

३. ओंकार दिघे हा सावळी गावात कधीपासून वास्तव्यास आहे?, कोणामुळे तो इकडे आला?

४. इतर जवळपास ४० कामगार या कामगारांसोबत काम करत होते त्यांच्याबाबत काय झालं ? त्यांना पळून जाण्यात कुणी मदत केली? पोलिसांनी कोणाच्या दबावाखाली त्यांना सोडून दिले.

५. ज्याला एक दिवस आधी २ किलो MD ड्रग्स सह अटक केली तो विशाल मोरे अजितदादा गटाचा पुण्यातील विद्यार्थी संघटनेचा प्रमुख आहे, त्याचे ओंकार दिघे आणि प्रकाश शिंदे यांच्याशी काय संबंध आहेत?

६. प्रकाश शिंदे कारवाईच्या आदल्या रात्रीपर्यंत तेजस हॉटेलवर होते, रात्री विशाल शिंदे याला अटक झाल्यावर ते हॉटेलवरून कसे निघून गेले? त्यांना तिथून पळून जाण्यास कोणी मदत दिली.

७. पोलिसांनी तेजस हॉटेलची झाडाझडती का घेतली नाही पंचनामा केला की नाही? महाराष्ट्राला ड्रग्स च्या विळख्यात लोटणाऱ्या या गंभीर घटनेवर गृहमंत्री अजून गप्प का आहेत?

हर्षवर्धन सपकाळ पुढे बोलताना म्हणाले की, मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने तिथे जाऊन धाड घालेपर्यंत सातारा पोलिसांना यांची कल्पना नव्हती का? त्यांच्या आशिर्वादानेच हा कारखाना सुरु होता? की उपमुख्यमंत्र्यांच्या जवळचे लोक हा कारखाना चालवत असल्याने कारवाई होतं नव्हती? जिथे साधा रस्ता नाही अशा दुर्गम भागात हे हॉटेल आणि ड्रग्सचा कारखाना एकाचवेळी सुरु झाले. कारखान्यात काम करणा-यांचे जेवणही याच हॉटेलमधून जात होते. या हॉटेलचे मालक आणि अंमली पदार्थांचा कारखाना चालवणारे एकच आहेत अशी माहिती स्थानिकांकडून मिळत आहे. त्याच्यावर कारवाई करू नये म्हणून उपमुख्यमंत्री आणि ठाणे जिल्ह्यातील एका खासदाराने पोलिसांवर दबाव आणला हे खरे आहे का? असा सवालही यावेळी केला.

पुढे बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी “ड्रग्स बनवणे सोपे आहे” असे बेजबाबदार वक्तव्य केले. यावरून तरुणाईचे भविष्य उद्ध्वस्त करणा-या या विषाचा व्यापार रोखण्याबाबत ते गंभीर नाहीत हे स्पष्ट झाले आहे. एकीकडे बांग्लादेशी घुसखोरांविरोधात ओरडणारे सत्ताधारी नेते बांग्लदेशींना आणून ड्रग्सच्या फॅक्टरी चालवत आहेत. एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना खिशात घातल्याचे वक्तव्य राजकीय पटलावर चर्चेत आहे. अमित शाह यांच्या दबावामुळे या प्रकरणातील आरोपींना अटक होतं नाही का? याचा खुलासाही सरकारने करावा अशी मागणीही यावेळी केली.

निवडणूक आयोगाचा कारभार पारदर्शक व निष्पक्ष नाही.

दरम्यान, हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, निवडणूक आयोगाने आज निवडणुकांच्या तारखांची घोषणा केली असली तरी निवडणूक याद्या, दुबार मतदार आणि प्रभाग रचनेबाबत आम्ही महत्त्वाचे पुराव्यासह, आक्षेप आणि हरकती नोंदवल्या होत्या. त्यावर आयोगाने काहीच कारवाई केली नाही. सत्ताधारी पक्षाचा पुण्यातील एक कार्यकर्ता उघडपणे वॉर्ड रचना करत असल्याचे समोर येऊनही आयोग गप्प का आहे? हे समजण्यापलीकडचे आहे. राज्यात माहापालिकांच्या निवडणुका होत आहेत पण त्या पारदर्शक आणि निष्पक्ष निवडणुका होणार नाहीत, हे आता स्पष्ट दिसत आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

About Editor

Check Also

माणगाव, तळा व म्हसळातील आदिवासी लाभार्थ्यांसाठी घरकुलासाठीचा प्रस्ताव सादर करा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांचे आदेश

माणगाव, तळा व म्हसळा नगरपंचायत हद्दीतील अनुसूचित जमातीच्या पात्र लाभार्थ्यांना आदिवासी घरकुल योजना (शहरी) अंतर्गत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *