पंढरपूर मतदारसंघातून भालकेंच्या विरोधात भाजपाची ढोबळे समर्थकाला उमेदवारी राष्ट्रवादी आणि भाजपाकडून उमेदवारांची अधिकृत घोषणा

मुंबई-सोलापूर: प्रतिनिधी

पंढरपूर – मंगळवेढा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी स्व.भारत नाना भालके यांचे सुपुत्र भगीरथ भारत भालके यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अधिकृत उमेदवारी जाहिर करण्यात आले तर भाजपाकडून पूर्वीचे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेले आणि माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जाणारे समाधान औताडे यांना उमेदवारी जाहिर केली.

पंढरपूर मतदारसंघाचे आमदार दिवंगत भारत भालके यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या रिक्त झालेल्या जागेसाठी आज राष्ट्रवादीकडून आदरणीय शरद पवारांच्या मान्यतेने पंढरपूर – मंगळवेढा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भगीरथ भारत भालके यांना अधिकृत उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले. भगीरथ भालके यांना उमेदवारी देण्याआधी पंढरपूरातील इतरांना संधी देण्याबाबत पक्षाकडून चाचपणी करण्यात आली. तसेच जून्या काही निष्ठावंताचाही विचार करण्यात येत होता. परंतु अखेर भगीरथ भालके यांच्याच गळ्यात उमेदवारीची माळ पडली.

सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात मंगळवेढ्याचे समाधान औताडे हे राष्ट्रवादीतून भाजपात गेलेले लक्ष्मण ढोबळे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. ढोबळे यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर त्यांच्याबरोबर अनेक कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला. मध्यंतरी त्यांनी एक खाजगी कारखानाही चालविण्यास घेतला होता. परंतु आता तो खाजगी कारखाना बंद पडला आहे. भाजपाने औताडे यांना उमेदवारी देत पुन्हा या भागातील निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय केल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे.

आमदार स्व.भारत नाना भालके यांना मानणारा पंढरपूरातील एक वर्ग असून स्व.सुधाकरपंत परिचारक यांचे विरोधी गटानेही भारत भालकेंना निवडून येण्यासाठी मोठी मदत केली होती. परंतु त्यांच्या निधनाने भालके यांना मानणाऱ्या वर्गाची मदत आणि सहानभूती भगीरथ भालकेंना होईल अशी अटकळ बांधण्यात येत आहे. त्यातच भारत भालके ज्या कारखान्याचे चेअरमन होते त्या कारखान्याची धुराही आता भगीरथ यांच्यावर सोपविण्यात आली आहे. त्यामुळे भारत भालके यांचे उत्तराधिकारी म्हणून त्यांच्या सुपुत्राकडे पाह्यले जात आहे. मात्र मंगळवेढा तालुक्यात धनगर समाज मोठ्या प्रमाणावर आहे. समाधान औताडे हे याच समाजातून पुढे आल्याचे सांगण्यात येते. औताडे यांची राजकिय कारकिर्द अद्याप जरी निष्कंलक असली तर भालकेंच्या तुलनेत त्यांना कितपत लोकांचे सहकार्य मिळेल हे आताच सांगणे कठिण असल्याची चर्चा पंढरपूर आणि मंगळवेढ्यात सुरु आहे.

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, राज्यातील नागरिकांचा माहितीचा अधिकारच काढून टाकण्याचे प्रयत्न राजपत्रातील बेकायदेशीर तरतुदी रद्द करा

सरकारी कारभारात पारदर्शकता असावी आणि त्याचे उत्तरदायित्व निश्चित करण्यासाठी काँग्रेसप्रणित युपीए सरकारने जनतेला ऐतिहासिक असा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *