नीट पेपरफुटी प्रकरणी मुंबई युवक काँग्रेसची मुंबई मेट्रोमध्ये प्रवाशांशी संवाद साधत जनजागृती मोहीम भाजपा सरकारच्या संरक्षणाखालीच पेपरफुटीचे रॅकेट फोफावल्याचा आरोप

मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरीन यांच्या नेतृत्वाखाली आज मुंबई युवक काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मुंबई मेट्रोमधून प्रवास करत नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणाविरोधात व्यापक जनजागृती मोहीम राबवली. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्या पेपरफुटी रॅकेटविरोधात संताप व्यक्त करत भाजप सरकारच्या भूमिकेचा निषेध करण्यात आला.

मुंबई मेट्रोमध्ये प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांपर्यंत पोहोचत युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी नीट पेपरफुटी संदर्भातील सविस्तर माहिती असलेली पत्रके वाटली. या पत्रकांमध्ये देशभरात उघड झालेल्या विविध पेपरफुटी प्रकरणांची माहिती, अटक करण्यात आलेल्या आरोपींची पार्श्वभूमी, तसेच पेपरफुटी रॅकेट आणि सत्ताधारी भाजपाशी संबंधित व्यक्तींमधील संबंध यांचा उल्लेख करण्यात आला होता. “पेपरफुटी ही केवळ परीक्षा व्यवस्थेतील चूक नसून ही संघटित भ्रष्ट व्यवस्थेची देण आहे,” असा आरोप यावेळी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केला. या मोहिमेदरम्यान कार्यकर्त्यांनी प्रवाशांशी संवाद साधत लाखो विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर पाणी फेरणाऱ्या या घोटाळ्यामुळे देशातील तरुणांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाल्याचे सांगितले. “विद्यार्थी रात्रंदिवस अभ्यास करून परीक्षा देतात, मात्र सत्ताधाऱ्यांच्या संरक्षणाखाली पेपर विकले जात असतील तर सामान्य विद्यार्थ्यांनी न्याय कुठे मागायचा?” असा सवाल युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित केला.

युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरीन म्हणाल्या की, “नीटसारख्या राष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या परीक्षेची पेपरफुटी होणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. लाखो विद्यार्थ्यांचे करिअर, पालकांची स्वप्ने आणि विद्यार्थ्यांची अनेक वर्षांची मेहनत एका भ्रष्ट रॅकेटमुळे उद्ध्वस्त होत आहे. देशातील तरुणाईला न्याय देण्यात भाजप सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. पेपरफुटीतील अनेक आरोपी भाजपाशी संबंधित असल्याची माहिती समोर येत आहे. पुण्यात ज्या संस्थांमध्ये काही आरोपी कार्यरत होते त्या संस्थांचेदेखील भाजपाशी संबंध असल्याची चर्चा आहे. पेपरफुटी प्रकरणातील आरोपींना राजकीय संरक्षण मिळत असल्यामुळेच अशा घटना सातत्याने घडत आहेत.” चार विद्यार्थ्यांनी आतापर्यंत NEET परीक्षा रद्द झाल्यामुळे आत्महत्या केल्या आहेत या सरकारी हत्या आहेत. याला जबाबदार शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी अद्याप राजीनामा दिला नाही.

त्या पुढे म्हणाल्या की, “देशातील प्रत्येक स्पर्धा परीक्षेभोवती भ्रष्टाचाराचे जाळे निर्माण झाले आहे. बेरोजगारीने आधीच त्रस्त असलेल्या तरुणांच्या भविष्याशी हा क्रूर खेळ सुरू आहे. सरकार विद्यार्थ्यांना सुरक्षा देण्यात अपयशी ठरत आहे. युवक काँग्रेस या अन्यायाविरोधात रस्त्यावर उतरून संघर्ष करत राहील. दोषींवर कठोर कारवाई, पेपरफुटी प्रकरणाची निष्पक्ष चौकशी आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळेपर्यंत आमचे आंदोलन सुरू राहील.”

युवक काँग्रेसच्या या जनजागृती मोहिमेला मेट्रो प्रवाशांनीही प्रतिसाद देत विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. या जनजागृती मोहिमेत युवक काँग्रेसचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

About Editor

Check Also

अतुल लोंढे यांचा आरोप, मोदी सरकारच्या १२ वर्षांतील चुकीच्या आर्थिक व परराष्ट्र धोरणांचा परिपाक रुपयाची घरसण होत असताना आता पंतप्रधानांची इज्जत घसरत नाही का?

देशात पेट्रोल व डिझेलची दरवाढ झाल्याने त्याचा मोठा फटका सर्वसामान्य जनतेला बसत आहे. इंधन महाग …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *