पंतप्रधान मोदी यांनी घेतली नार्वेच्या पंतप्रधानांची भेट युक्रेन संघर्षावर तोडगा काढण्याचे केले आवाहन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी (१८ मे, २०२६) पश्चिम आशिया संकट आणि युक्रेन संघर्षावर संवाद आणि मुत्सद्देगिरीद्वारे तोडगा काढण्याचे आवाहन केले. केवळ लष्करी कारवाईने चिरस्थायी शांतता प्रस्थापित होऊ शकत नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले.

द्विपक्षीय संबंधांना एकंदरीत गती देण्यावर लक्ष केंद्रित करून नॉर्वेचे पंतप्रधान जोनास गहर स्टोअर यांच्यासोबत झालेल्या व्यापक चर्चेनंतर पंतप्रधान मोदी यांनी ही टिप्पणी केली.

पुढे बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, “भारत आणि नॉर्वे, दोन्ही देश नियम-आधारित व्यवस्था, संवाद आणि मुत्सद्देगिरीवर विश्वास ठेवतात. कोणताही प्रश्न केवळ लष्करी संघर्षाने सोडवला जाऊ शकत नाही, यावर आमचे एकमत आहे,” असे प्रसारमाध्यमांना दिलेल्या दूरचित्रवाणी निवेदनात म्हटले.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, “युक्रेन असो वा पश्चिम आशिया, संघर्षाचा लवकर अंत करण्यासाठी आणि शांततेसाठीच्या प्रत्येक प्रयत्नांना आम्ही पाठिंबा देत राहू,” असेही सांगितले.

आपल्या चार-देशीय युरोप दौऱ्याचा भाग म्हणून स्वीडनहून ओस्लोमध्ये उतरल्यानंतर काही तासांनी पंतप्रधान मोदी यांनी नॉर्वेचे पंतप्रधान जोनास गहर स्टोअर यांची भेट घेतली.

आपल्या भाषणात पंतप्रधान मोदी यांनी जागतिक संस्थांमध्ये सुधारणा करण्याच्या गरजेवरही भर दिला.

“वाढत्या जागतिक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी जागतिक संस्थांमध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे, या मुद्द्यावर आमचेही एकमत आहे.” “आणि दहशतवादाचे प्रत्येक स्वरूप मुळापासून नष्ट करणे ही आमची सामायिक वचनबद्धता आहे,” असे त्यांनी नमूद केले.

गेल्या वर्षी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ जण ठार झाले होते, ज्यात बहुतांश पर्यटक होते. या हल्ल्यानंतर भारताला दिलेल्या पाठिंब्याबद्दल पंतप्रधान मोदी यांनी नॉर्वेचे कौतुकही केले.

“गेल्या वर्षी मी नॉर्वेला भेट देणार होतो, पण पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे मला तो दौरा पुढे ढकलावा लागला. त्या कठीण काळात नॉर्वे दहशतवादाविरोधात भारताच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला आणि त्याने खरी मैत्री दाखवून दिली,” असे मोदी म्हणाले.

“आज नॉर्वेला भेट देताना, मी त्या एकजुटीबद्दल मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो,” असे ते म्हणाले.

भारताच्या नेतृत्वाखालील इंडो-पॅसिफिक ओशन्स इनिशिएटिव्हमध्ये सामील होण्याच्या नॉर्वेच्या निर्णयाचेही मोदींनी कौतुक केले.

“दोन प्रमुख सागरी राष्ट्रे म्हणून, आम्ही सागरी अर्थव्यवस्था, सागरी सुरक्षा आणि क्षमता बांधणी या क्षेत्रांमधील सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी एकत्र काम करू,” असे ते म्हणाले.

About Editor

Check Also

जनसेना पक्षाचे प्रमुख पवन कल्याण यांची स्पष्टोक्ती, तामिळनाडूतील परिस्थिती वेगळी तामिळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांच्या राजकीय यशाचा तुलनात्मक अभ्यासावेळी केले वक्तव्य

आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री आणि जनसेना पक्षाचे प्रमुख पवन कल्याण यांनी, त्यांच्या राजकीय प्रवासाची तुलना विजय …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *