वर्षा गायकवाड यांचा विश्वास, महाराष्ट्रात यापुढे सत्तांतर लोकच करणार ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी महाविकास आघाडीसोबत यावं

लोकसभेची निवडणूक लोकांनीच हातात घेतली होती. महाराष्ट्रात यापुढे सत्तांतर लोकच करणार आहेत. मी वंचित बहुजन आघाडीचे नेते सन्माननीय ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनीही सोबत यावं ही कळकळीची विनंती करते. आपण महाविकास आघाडीचं सरकार आणुया, असं आवाहन मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार प्रा. वर्षाताई गायकवाड यांनी केले.

काँग्रेस मुख्यालयात रिपब्लिकन पक्षाच्या आणि रिपब्लिकन सेनेच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी बोलताना प्रा. वर्षा गायकवाड म्हणाल्या की, लोकसभा निवडणुकीत ॲड. बाळासाहेब आंबेडकरांनी काही ठिकाणी काँग्रेस उमेदवारांना पाठिंबा जाहीर केला. मी ही भीमकन्या आहे. मलाही पाठिंबा दिला असता तर समाधान वाटलं असतं. मात्र आता विधानसभेसाठी त्यांनी सोबत यावं असं आवाहन मी करते.

वर्षा गायकवाड पुढे बोलताना म्हणाल्या की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आणि संविधानाच्या मुल्ल्यांवर आम्ही काम करतो आहोत. राजकारण करत असताना कोणत्याही रिपब्लिकन पक्षावर आम्ही कधी टीकाटिप्पणी केली नाही. ही माझ्या वडिलांची शिकवण आहे, असेही सांगितले.

काँग्रेस पक्ष हा एक परिवार आहे. या परिवाराचा विचार हा बाबासाहेबांचा विचार आहे. आपणा सगळ्यांचं या परिवारात मी स्वागत करते, असंही खासदार वर्षा गायकवाड यांनी सांगितले.

यावेळी रिपब्लिकन पक्ष आठवले गटाचे उपाध्यक्ष शरद बोडके व रिपब्लिकन सेनेचे विजय देठे यांनी कार्यकर्त्यांसमवेत काँग्रेस मध्ये प्रवेश केला आणि खासदार वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचा तिरंगा हाती घेतला.
यावेळी संघटन प्रभारी प्राणिल नायरजी, खजिनदार संदीप शुक्लाजी, मुंबई काँग्रेस पदाधिकारी तुषार गायकवाड, बी. के. तिवारी, गोविंद सिंग, डॉ. अजंता यादव आणि कचरू यादव हे उपस्थित होते. तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. राजेश टेके यांनी केले.

About Editor

Check Also

नितेश राणे यांची माहिती, जलवाहतूक सेवा होणार डिजिटल ऑनलाईन तिकीट व्यवस्थेची अंमलबजावणी करणार

मुंबई महानगर प्रदेशातील जलवाहतूक सेवा अधिक आधुनिक, पारदर्शक आणि प्रवासी-अनुकूल करण्यासाठी ऑनलाईन तिकीट व्यवस्थेची अंमलबजावणी करण्यात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *