लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी संसदेत जोरदार हल्ला चढवला. महिला आरक्षण चौकट आणि मतदारसंघ पुनर्रचना यांच्यातील प्रस्तावित संबंधाचा वापर करून भारताचा निवडणूकीचा नकाशा चोरण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला.
राहुल गांधी यांनी असा युक्तिवाद केला की, २०२३ मध्ये मंजूर झालेले महिला आरक्षण विधेयक हा ‘खरा कायदा’ होता आणि त्याची अंमलबजावणी मतदारसंघ पुनर्रचनेशी जोडण्याचा सध्याचा प्रयत्न हा राजकीय सीमा पुन्हा आखण्याचा हेतुपुरस्सर प्रयत्न आहे.
सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला लक्ष्य करत, राहुल गांधी यांनी दावा केला की पक्ष देशाचा राजकीय नकाशा बदलण्याचा प्रयत्न करत आहे आणि यासाठी आसाम व जम्मू आणि काश्मीरमधील घडामोडींचा दाखला दिला. त्यांनी असा इशाराही दिला की राष्ट्रीय स्तरावर अशाच बदलांसाठी घटनादुरुस्तीची आवश्यकता असेल आणि त्याचा प्रतिनिधित्वावर लक्षणीय परिणाम होऊ शकतो.
राहुल गांधी यांच्या मते, अशा निर्णयामुळे दक्षिणेकडील राज्ये, ईशान्येकडील राज्ये आणि लहान राज्यांचा राजकीय आवाज विषम प्रमाणात कमी होईल. “तुम्ही ईशान्येकडील राज्यांना, भारतातील लहान राज्यांना सांगत आहात की, भाजपला सत्तेत राहण्यासाठी आम्ही तुमचे प्रतिनिधित्व काढून घेणार आहोत. हे देशद्रोही कृत्यापेक्षा कमी नाही,” असे ते म्हणाले.
“पहिले सत्य हे आहे की, हे महिलांचे विधेयक नाही. याचा महिला सक्षमीकरणाशी काहीही संबंध नाही. हा भारताचा निवडणूक नकाशा बदलण्याचा प्रयत्न आहे,” असेही ते म्हणाले.
त्यांच्या या वक्तव्यामुळे सत्ताधारी बाकांवरून तीव्र निषेध व्यक्त झाला आणि त्यांच्या भाषणादरम्यान सदस्य विरोधात उभे राहिले.
त्यांनी पुढे असा आरोप केला की, जात जनगणना टाळून मागासलेल्या समाजांचे राजकीय प्रतिनिधित्व मर्यादित करणे हा यामागील उद्देश आहे.
राहुल गांधी पुढे म्हणाले की, “भारतीय समाजाने दलित, ओबीसी आणि त्यांच्या महिलांना कशी वागणूक दिली, हे एक ऐतिहासिक सत्य आहे. येथे जात जनगणनेला बगल देण्याचा प्रयत्न केला जात आहे. ते माझ्या ओबीसी बंधू-भगिनींना सत्ता आणि प्रतिनिधित्व देण्याचे टाळून त्यांच्याकडून सत्ता काढून घेण्याचा प्रयत्न करत आहेत,” असे सांगितले.
राहुल गांधी यांनी टीका अधिक तीव्र करत,सरकारवर ‘संविधानापेक्षा मनुवादाला’ प्राधान्य देत असल्याचा आरोप केला आणि जात जनगणनेमागील हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा उल्लेख करत राहुल गांधी म्हणाले, “घरांना जात नसते, असे वारंवार सांगत ते म्हणतात की जात जनगणना सुरू झाली आहे. मुद्दा हा आहे की, या जात जनगणनेचा उपयोग संसद आणि राज्य विधानसभांमधील प्रतिनिधित्वासाठी केला जाईल का. तुम्ही हेच सुनिश्चित करण्याचा प्रयत्न करत आहात की, पुढील १५ वर्षांसाठी प्रतिनिधित्वाशी जात जनगणनेचा काहीही संबंध राहणार नाही.”
परिसीमनाच्या मुद्द्यावर, राहुल गांधी यांनी आरोप केला की, भाजपा राजकीय असुरक्षिततेतून वागत आहे. “तुम्ही तुमची ताकद कमी होण्याच्या भीतीने भारताचा राजकीय नकाशा बदलण्याचा प्रयत्न करत आहात. तुम्ही हे आसाम आणि जम्मू-काश्मीरमध्ये केले, आणि आता कल्पना करा की तुम्ही हे संपूर्ण भारतात करू शकता,” असे ते म्हणाले.
Marathi e-Batmya