मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आतापर्यंत जवळपास सहा ते सात वेळा आमरण उपोषण पुकारण्याऱ्या मराठा आरक्षण समर्थक मनोज जरांगे यांनी यापूर्वीच घोषणा केल्याप्रमाणे आरक्षण प्रश्नी मुंबई आंदोलन करण्यासाठी येत आहेत. मुंबईच्या दिशेने आंदोलनासाठी कुच करणार असल्याचे जाहिर करताच भाजपा समर्थित काही जणांकडून मुंबईतील आंदोलनाच्या विरोधात मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या. त्यावर न्यायालयाने दिर्घकाळ आंदोलनासाठी परवानगी देता येणार नसल्याचे सांगत मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला अप्रत्यक्ष विरोध दर्शविला. तसेच मुंबईबाहेर या आंदोलनासाठी जागा देण्यासंदर्भातील निर्णय राज्य सरकारवर सोडला. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन मुंबईत होणार की नाही अशी अटकळ बांधली जात असतानाच मुंबई पोलिसांनी मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाला परवानगी दिली. मात्र या आंदोलनाला परवानगी देतानाच मुंबई पोलिसांनी तीन अटी मात्र आंदोलकांसमोर ठेवल्या आहेत.
मुंबई पोलिसांनी मराठा आंदोलक आणि मनोज जरांगे पाटील यांना आझाद मैदानावर आंदोलन करण्यास एक दिवसाचा अवधी दिला असून त्यासह आणखी अटी व शर्ती मनोज जरांगे पाटील यांच्यासमोर ठेवल्या आहेत.
आंदोलनाला परवानगी देताना पोलिसांनी मनोज जरांगे पाटील यांना पाच वाहनं आणण्याची आणि त्याबरोबर पाच हजार समर्थक एक दिवसाच्या आंदोलनाला आणण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील आणि त्यांचे आंदोलक समर्थक या अटी माणनार का असा सवाल निर्माण होत आहे. तसेच मनोज जरांगे पाटील या अटीवर आंदोलन करणार का याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
पोलिसांनी परवानगी दिल्यानंतर मनोज जरांगे पाटील नेमके काय म्हणाले
पोलिसांनी मराठा आरक्षणासंदर्भात परवानगी दिल्यानंतर प्रसारपमाध्यमांच्या प्रतिनिधींनी मनोज जरांगे पाटील म्हणाले की, मी लोकशाहीच्या व कायद्याच्या नियमांचे पालन करेन, माझ्याबरोबर येणारा माझा समाज देखील सर्व नियम पाळेल. आम्ही हट्टी नाही. प्रशासनाने सांगितलेल्या सर्व नियमाचं तंतोतत पालन केले जाईल. परंतु आम्ही एक दिवस आंदोलन करणार नाही. आम्हाला बेमुदत आंदोलन करायचं आहे. आमच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन करत राहणार असा निर्धार व्यक्त करत उर्वरित सगळे नियम पाळणार असल्याचे सांगितले.
पुढे बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, आंदोलनाला मिळाल्या परवानगी बाबत मी आताच फार काही बोलणार नाही. कारण पोलिसांनी नेमक्या काय अटी व शर्ती ठेवल्या आहेत त्या बाबत मला माहिती नाही. मी पोलिसांचा आदेश वाचतो आणि त्यानंतरच यावर प्रतिक्रिया देते.परंतु मिळालेल्या परवानगीबद्द सरकार आणि न्यायालयाचे मी आभार मानतो असे सांगितले.
Marathi e-Batmya